राज्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दल   

मुंबई,  (प्रतिनिधी) : पर्यटन क्षेत्राला चालना देतानाच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी दिली. येत्या २ ते ४ मे दरम्यान पार पडणार्‍या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ’महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
राज्यात येणार्‍या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचार्‍यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. 
 
राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार असून त्यांच्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढणार आहे. या दलातील कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
 
२ ते ४ मे  दरम्यान पार पडणार्‍या महाबळेश्वर महोत्सवात  सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार असून हे दल  २५ एप्रिल  ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. 
 
महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Articles